पुणे : ‘सध्या मराठी चित्रपटसृष्टी चांगल्या संक्रमणातून चालली असून, यामुळे मराठी कलाकारांनाही सुगीचे दिवस आले आहेत.कलाकारानेही रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाला प्रामाणिकपणे जागून, त्यास आपल्या अभिनयाने प्रेमाचीच पावती देणे क्रमप्राप्त आहे’, असे मत मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी याने व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कट्ट्यावर ‘मुंबई-पुणे-मुंबई’ फेम हिट जोडी मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.
‘मुंबई-पुणे-मुंबई’ या शृखंलेतील तिसरा भाग येत्या सात डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत मराठी प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढीस लागली असल्याने सांस्कृतिक कट्ट्यावरची चर्चा चांगलीच रंगली.
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या पहिल्या भागाला मिळालेल्या चांगल्या यशाबाबत प्रेक्षकांना धन्यवाद देताना, हा प्रवास तब्बल सात वर्षे चालेल असे वाटले नव्हते, अशी भावना व्यक्त केली. ‘रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही या शृखंलेतील तिसरा भाग लवकरच प्रदर्शित करीत असून, यामधील लग्न झालेली गौतम आणि गौरी हे प्रेक्षकांना नक्कीच भावतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, ‘पहिल्या भागात गौतम व गौरी यांच्यातील प्रियकर आणि प्रेयसीचे नाते सर्वांना भावले. दुसऱ्या भागात त्यांच्या लग्नादरम्यानच्या कौटुंबिक जिव्हाळ्याने प्रेक्षकांना आपलेसे केले. तिसऱ्या भागातदेखील लग्न झालेल्या गौतम व गौरीचा प्रवासही सर्वसामान्यांना तितकाच आपलासा वाटणारा आणि रोमांचित करणारा असेल.’
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणाली, ‘या चित्रपटांच्या शृंखलेतील सर्व कलाकार म्हणजे एक कुटूंबच झाले आहे. आपल्या व्यस्त दिनचर्येतून या चित्रपटासाठी अनेक ज्येष्ठ अभिनेते व अभिनेत्री वेळात वेळ काढून उपलब्ध होतात याला कारण म्हणजे आमच्यातील जमलेली छानशी केमिस्ट्री. चित्रपटाच्या यशात याच केमिस्ट्रीचा खूप मोठा वाटा आहे.’